बंद

    26.12.2021: ‘आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी आपापल्या क्षेत्रात अधिकतम योगदान द्यावे: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: December 26, 2021

    उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्काराने सन्मानित

    ‘आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी आपापल्या क्षेत्रात अधिकतम योगदान द्यावे: राज्यपाल

    कलाकार, उद्योजक, खेळाडू, शेतकरी, व्यावसायिक, श्रमिक व सृजनात्मक कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींमुळेच देश मोठा होत असतो. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपापल्या क्षेत्रात प्रत्येकाने अधिकतम योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २६) विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४४ व्यक्तींना ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    पीपल्स आर्ट सेंटर या संस्थेतर्फे रंगशारदा सभागृह येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे, अशा खाडिलकर यांसह कृषी, उद्योग, कला, क्रीडा व इतर क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    यावेळी पीपल्स आर्ट सेंटरचे विश्वस्त गोपकुमार पिल्लई व अध्यक्ष डॉ आर के शेट्टी व्यासपीठावर उपस्थित होते.

    नागपूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ उदय माहूरकर, बीव्हीजी कंपनीचे हनुमंतराव गायकवाड, तबला वादक माधव पवार, बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे (भाग्यश्री ठिपसे), शिल्पकार भगवान रामपुरे, चित्रकार प्रभाकर कोलते, वास्तूविशारद शशी प्रभू, पर्यावरण कार्यकर्ते किशोर रिठे, दीपक शिकारपूर, आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.