बंद

    04.06.2022 : “हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्राकडून बहुभाषिकत्वाचा गुण घ्यावा” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: June 4, 2022

    “हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्राकडून बहुभाषिकत्वाचा गुण घ्यावा” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    हिंदी भाषिक लोक केवळ आपली प्रादेशिक असलेली हिंदी भाषा बोलतात, परंतु महाराष्ट्रातील लोक मराठी शिवाय हिंदी भाषा देखील उत्तम बोलतात. अनेकदा महाराष्ट्र व गुजरात मधील लोक मूळ हिंदी भाषिक लोकांपेक्षा अधिक चांगली हिंदी बोलतात. हा बहुभाषिकतेचा गुण आपण घेतला पाहिजे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केली.

    उत्तराखंडी भाषा संमेलनाच्या माध्यमातून राजभवन मुंबई येथे ‘उत्तराखंडची प्रातिनिधिक भाषा’ या विषयावर एका चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    एखादी भाषा केवळ लिहून – वाचून येत नाही. तर भाषा ऐकून, व्यवहारात आणून व बोलून चांगली आत्मसात होते असे सांगताना उत्तराखंडच्या लोकांनी आपल्या गढवाली, कुमाऊँनी व इतर भाषा बोलल्या पाहिजे, मुलांना शिकविल्या पाहिजे, आपापसात आपल्या भाषेत बोलले पाहिजे तसेच आपल्या भाषेत लघुपट, माहितीपट, व सिनेमांची निर्मिती केली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. भाषा प्रसारासाठी मिशन मोडवरच काम केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    आपण कुमाऊं प्रदेशात जातो त्यावेळी लोकांशी कुमाऊँनी भाषेतच बोलतो असे सांगताना कुमाऊंनी – गढ़वाली भाषांमध्ये विपुल साहित्य आहे, एकापेक्षा एक सरस वाक्प्रचार व म्हणी आहेत; हिंदी सिनेमामुळे जसा हिंदी भाषेचा प्रचार प्रसार झाला तसा कुमाऊँनी – गढवाली या भाषांचा प्रसार त्या भाषेतील लोकगीतांमधून होतो, असे राज्यपालांनी सांगितले.

    महाराष्ट्रातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण सर्व विद्यापीठांना दीक्षांत समारोहाचे संचालन इंग्रजीतून न करता मराठी भाषेतून करण्याचा आग्रह धरला व आज सर्व विद्यापीठे आवर्जून मराठी भाषेतून सूत्र संचलन व भाषणे करतात असे राज्यपालांनी सांगितले.

    छत्तीसगह, झारखंड या नव्याने निर्माण झालेल्या राज्यांना देखील स्वतःची भाषा आहे, परंतु उत्तराखंडला स्वतःची सामायिक भाषा नाही. उत्तराखंड येथे गढवाली – कुमाऊँनी यांसह १४ बोलीभाषा आहेत. या दृष्टीने राज्याची एक प्रातिनिधिक सामायिक भाषा विकसित झाली पाहिजे असे मत साहित्यिक डॉ राजेश्वर उनियाल यांनी मांडले.

    भाषा राजाश्रयानेच वाढते त्यामुळे शासनाने उत्तराखंडच्या भाषांना प्रोत्साहन द्यावे व त्यादृष्टीने समितीचे गठन करावे असे मत ज्येष्ठ साहित्यिक व भाषाविद डॉ बिहारीलाल जलंधरी यांनी व्यक्त केले. उत्तराखंड राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील अनेक शब्द मिळते जुळते आहेत. त्यामुळे सर्व भाषांना संगठीत करून उत्तराखंडी भाषा बनवावी अशी अपेक्षा डॉ अशा रावत यांनी व्यक्त केली.

    गढवाली – कुमाऊंनी या भाषा हिंदीपेक्षा अधिक जुन्या आहेत असे सांगून मूळ भाषांचे अस्तित्व टिकावे अशी अपेक्षा नीलांबर पांडे यांनी व्यक्त केली.

    चर्चासत्राला ज्येष्ठ पत्रकार गणेश पाठक, मुख्य आयोजक चामू सिंह राणा व सूत्रसंचालक संजय बलोदी ‘प्रखर’ प्रामुख्याने उपस्थित होते.

    राज्यपालांच्या हस्ते डॉ बिहारीलाल जलंधरी यांनी लिहिलेल्या ‘उत्तराखंड की जनश्रुतियां’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.