बंद

    01.05.2023: महाराष्ट्र दिनानिमित्त मा. राज्यपालांचे भाषण

    प्रकाशित तारीख: May 2, 2023

    महाराष्ट्र दिनानिमित्त मा. राज्यपालांचे भाषण

    दिनांक 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मुंबई येथे आयोजित शासकीय कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस यांचे महाराष्ट्र दिनाचे भाषण

    बंधू आणि भगिनींनो,

    1. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी जनतेला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.

    आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडला आहे, त्यांचे स्मरण ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.

    2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र ओळखला जातो. महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केले.

    3. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्ताने येत्या 2 ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे.

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत “स्वातंत्र्यवीर गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

    4. माझ्या शासनाने 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत स्वीकारले आहे.

    5. कोविडच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रीतीने सामना करीत असताना आपल्या राज्याने देशात एक उदाहरण निर्माण केले आहे. सध्या कोविडचे रुग्ण वाढताना दिसत असल्याने महाराष्ट्रातील जनतेने आपले आरोग्य सांभाळावे असे आवाहन मी आपल्याला करतो.

    6. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक 1.50 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात येत आहे.

    राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. मुंबईतील जी.टी. रुग्णालयात तृतीयपंथासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे.

    7. कोविडनंतर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि रोजगार निर्मिती करणे यावर शासन भर देत आहे. महाराष्ट्रात लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील स्टार्टअप इको सिस्टीम वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

    भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना माझ्या शासनामार्फत विविध विभागांमध्ये 75 हजार शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. याअंतर्गत राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी 18 हजार 331 शिपाई भरती प्रक्रियाही प्रगतीपथावर आहे.

    8. माझ्या शासनाने 45 विविध उद्योग आणि उद्योग समूह यांच्यासमवेत करार करुन 1 लाख 25 हजार रोजगार उपलब्ध करुन दिले आहेत. युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

    प्रत्येक जिल्हयातील किमान 500 युवकांना जलपर्यटन, कृषीपर्यटन, कॅराव्हॅन पर्यटन, साहसी पर्यटन तसेच शाश्वत पर्यटन तसेच आदरतिथ्य क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यात येईल.

    गेल्या वर्षी मनरेगा मध्ये 36.32 लाख मजुरांना मजुरी उपलब्ध करुन देण्यात आली.

    9. देशातले 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी माझ्या शासनाने विकासाची पंचसूत्री ठरविली आहे. जी-20 परिषदेचे यजमानपद भारताला मिळणे ही भारतासाठी अत्यंत गौरवाची आणि आनंदाची बाब आहे. जी-20 परिषदेच्या पायाभूत सुविधांच्या कार्यगटांच्या महाराष्ट्रात आतापर्यंत मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे बैठका झाल्या असून सहभागी प्रतिनिधींनी परिषदेचे भरभरुन कौतुक केले आहे.

    10. माझ्या शासनाने हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम 88 टक्क्यांहून अधिक पूर्ण केले आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या 521 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण करुन हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. आतापर्यंत या महामार्गाचा वापर 10 लाखांहून अधिक वाहनांनी केला आहे.

    11. नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी सुद्धा आता मदत करण्यात येईल.

    12. माझ्या शासनाने, बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” आणली आहे. यामध्ये केंद्र शासनामार्फत प्रतिवर्षी प्रतिशेतकरी 6 हजार रुपये देत असून आता राज्य शासनही प्रति शेतकरी 6 हजार रुपये देणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना 12 हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विमाहप्त्यात 2 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. आता ही रक्कम माझ्या शासनामार्फत भरली जाणार असून शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येईल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुदानाचा लाभ सुमारे 14 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे.

    13. माझ्या शासनामार्फत प्रकल्पबाधित मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण करण्यात आले आहे. या वर्षापासून पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांसाठी 5 लाख रुपयांची विमा छत्राची योजना राबविण्यात येणार आहे.

    14. शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या काळात माझ्या शासनाने चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेल्या “आनंदाचा शिधा” संचाचे फक्त शंभर रुपये इतक्या माफक दराने वितरण केले. राज्यातील 1 कोटी 63 लाखांहून अधिक कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.

    15. माझ्या शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” ही नवीन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर ती 18 वर्षांची झाल्यानंतर रोख 75 हजार रुपये देण्याची योजना आहे. याशिवाय महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. महिलांना घर खरेदीमध्ये मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत देण्यात आली आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून मोफत प्रवास तसेच 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधील प्रवासी भाडयात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यासह अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

    16. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास करण्यास माझे शासन कटिबद्ध आहे. दिव्यांगांचे संरक्षण, पुनर्वसन, रोजगार आणि स्वयंरोजगार याची अंमलबजावणी करण्यासाठी माझ्या शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

    17. माझ्या शासनाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत 5 पट वाढ केली आहे. आता अनुक्रमे सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख, रौप्यपदक खेळाडूंना 30 लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 20 लाख रुपये बक्षीस रक्कम दिली जाणार आहे.

    18. राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात रेती/वाळू मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष असे रेती धोरण तयार करण्यात आले आहे.

    19. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा याकरिता शासन केंद्राकडे पाठपुरावा करीत आहे. येत्या काळात अमरावती येथील रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.

    20. माझ्या शासनाने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास आर्थिक सहाय्याच्या रकमेतही 15 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

    21. आजच्यादिनी एक नवीन आणि बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन मी करतो.

    पुन्हा एकदा, महाराष्ट्र दिनाच्या या मंगल प्रसंगी राज्यातील जनतेला मी मन :पूर्वक शुभेच्छा देतो.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !!