बंद

    04.02.2021 : समर्थ वाग्देवता मंदिराच्या कार्यासाठी 5 लाखाचा निधी – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: February 4, 2021

    समर्थ वाग्देवता मंदिराच्या कार्यासाठी 5 लाखाचा निधी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    धुळे, दि.4 (जिमाका वृत्तसेवा) :समर्थ रामदास स्वामींचे साहित्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे समर्थ वाग्देवता मंदिराचे कार्य महत्वाचे असून संस्थेच्या कार्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

    समर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामी लिखित ‘वाल्मिकी रामायण-किष्किंधा कांड’ या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ.सुभाष भामरे, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर, उपसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, समर्थ वंशज भूषण स्वामी, कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.

    श्री. कोश्यारी म्हणाले,जगातील विविध देशात रामायण पोहचले आहे. रामायणाच्या माध्यमातून मानव जीवनाला आदर्श असणारे भारतीय संस्कृतीचे मूल्ये प्रकट होतात. प्रभु रामचंद्राचे समुद्रासारखे गांर्भिय आणि हिमालयसारखे र्धेर्य सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या जीवनातील मूल्ये देशाला जोडण्याचे कार्य करतात.

    साहित्य आणि संस्कृती हेच खरे शाश्वत धन असते. आपल्या विद्वतेमुळे विद्वानाला सर्वत्र मानाचे स्थान असते. ॲलेक्झांडरसारख्या सम्राटालाही विद्वत्तेसमोर झुकावे लागले होते, अशा विद्वान, संत- महाम्यांचा हा देश आहे. जग पुन्हा एकदा प्राचीन भारतीय साहित्याकडे वळताना दिसत आहे. अशा वेळी समर्थ वाग्देवता मंदिरातर्फे घेण्यात आलेले प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरतील आणि समर्थ रामदासांच्या साहित्यांतील विचार समाजापर्यंत पोहचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    प्रास्ताविकात श्री.डोंगरे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. रामायणाच्या आंतरराष्ट्रीय संशोधनाचे केंद्र उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

    तत्पूर्वी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी समर्थ वाग्देवता मंदिराला भेट देऊन दुर्मिळ साहित्य व हस्तलिखिताविषयी माहिती घेतली. त्यांनी समर्थ वाग्देवता मंदिराच्या या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले.
    राज्यपाल महोदयांच्या हस्ते रामायण संशोधन प्रकल्पात योगदान देणारे न्या.अंबादास जोशी, डॉ.अरुंधती जोशी, डॉ.रुपाली कपडे, डॉ.शोभा शिंदे, कलनिधी वासुदेव कामत, बाळूबुवा रामदासी, हर्षवर्धंन कुळकर्णी, डॉ.निलेश जोशी वैशंपायन आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

    0000