बंद

    मा. राज्यपालांचे महाराष्ट्र राज्याच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी भाषण.

    प्रकाशित तारीख: May 1, 2018

    महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव यांनी मंगळवार दि ०१ मे, २०१८ रोजी शिवाजी पार्क, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या ५८ व्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी महाराष्ट्र दिनाचा संदेश.

    बंधू आणि भगिनींनो,

    १. मी, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच, आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आहे आणि त्या निमित्ताने तमाम श्रमिक वर्गाला आणि आपल्या या महान राज्यासाठी आणि देशासाठी जे कष्ट करीत आहेत त्या बांधवांनाही माझ्या शुभेच्छा.

    २. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो.

    ३. या प्रसंगी आपल्या राज्याचे थोर द्रष्टे लोकनेते आणि समाजसुधारक, विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारखे इतर थोर नेते यांचे स्मरण करू या. ते आपल्या आधुनिक महाराष्ट्राचे संस्थापक आहेत.

    ४. बंधू आणि भगिनींनो, माझे शासन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांधील आहे. मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार आणि विहिरी खोदणे यांसारख्या योजना राबवून माझे शासन राज्यभरातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. चालू वर्षात, शासनाने 2.26 लाख हेक्टर इतकी सिंचनक्षमता निर्माण करण्याचे आणि पाण्याच्या साठवणक्षमतेत 853 दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढ करण्याचे योजले आहे. काम सुरू असलेले 50 सिंचन प्रकल्प शासन प्राथम्याने पूर्ण करण्यावर भर देत आहे.

    ५. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत, 55 लाखांपेक्षा अधिक खातेधारक शेतकऱ्यांना कृषि कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यापैकी साडे शेहेचाळीस लाख इतक्या खातेधारक शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. आतापर्यंत, चौदा हजार सातशे एकोणनव्वद कोटी रुपये इतकी रक्कम सदतीस लाख वीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. 2001 पासून कर्ज थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने अलिकडेच घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते मात्र 2008 व 2009 मधील कर्जमाफीच्या लाभांपासून वंचित राहिले होते अशा जवळपास तीन लाख इतक्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.

    ६. मला आपणास सांगण्यास आनंद होत आहे की, स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून आतापर्यंत, महाराष्ट्रात 60 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. मला हे नमूद करताना आनंद होत आहे की, राज्यातील 34 जिल्हे, 351 तालुके, 27,667 ग्रामपंचायती आणि 40,500 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत.

    ७. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होत असलेला धोका लक्षात घेऊन, माझ्या शासनाने अलिकडेच विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक आणि थर्माकोल यांचे संनियंत्रण करण्याचे तसेच प्लास्टिकच्या रिसायकलिंगला चालना देण्याचे ठरविले आहे. यासाठी प्लास्टिक उत्पादकांवर रिसायकलिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच विघटन न होणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचे ठरविले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे पर्यावरण तसेच निसर्ग संपदेचे संरक्षण होणार आहे. या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मी सर्वांना करीत आहे.

    ८. यावर्षी, अलिकडेच माननीय पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या “मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक गुंतवणूकदारांच्या” महामेळाव्यात 12.10 लाख कोटी रुपये गुंतवणुकींचा अंतर्भाव असणाऱ्या 4106 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांमुळे 36.77 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचप्रमाणे, रेल्वेसोबत 600 कोटी रुपये इतक्या रकमेच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. अलिकडेच लातूर येथे रेल्वे डब्यांच्या एका कारखान्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्षात 25,000इतक्या नोकऱ्या निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. मला आपणास सांगण्यास अभिमान वाटतो की, महाराष्ट्र हे, भारतातील पहिले हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

    ९. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, राज्याच्या ग्रामीण भागात अंदाजे ४ लाख घरे पूर्ण करण्यात आली आहेत. सन २०१९ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर लोकांना घरे देण्यासाठी आणखी १२ लाख घरे बांधण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे.

    १०. शासनाने, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी व कार्याशी संबंधित ठिकाणे, तीर्थयात्रा व पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्याचे ठरविले आहे. या स्थळांमध्ये, महाडचे चवदार तळे, नाशिक येथील काळाराम मंदिर, नागपूर येथील दीक्षाभूमी, देहू रोड येथील बुद्ध विहार, सातारा विद्यालय आणि भीमा-कोरेगाव येथील स्मारक स्तंभ यांचा समावेश आहे.

    ११. अस्मिता योजनेअंतर्गत, माझे शासन, किशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन नाममात्र दराने पुरवील. या निर्णयाचा राज्यातील सुमारे सात लाख विद्यार्थिनींना लाभ होईल.

    १२. माझ्या शासनाने, खुल्या प्रवर्गांमधून अनाथ व्यक्तींसाठी एक टक्का इतके आरक्षण देण्याचे ठरविले असून देशात अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. यामुळे अनाथ म्हणून वाढलेल्या व्यक्तींना, शिक्षण व सरकारी नोकऱ्यांसाठी या आरक्षणाचा लाभ घेता येईल.

    १३. उद्योग, व्यवसायामधील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी, माझ्या शासनाने, महिला उद्योजकांसाठी समिर्पित असे औद्योगिक धोरण घोषित केले आहे. यामुळे 20,000 महिला उद्योजकांना उद्योग- व्यवसाय सुरू करणे शक्य होईल. त्यामुळे पुढील 5 वर्षांमध्ये एक लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील, असा मला विश्वास आहे.

    १४. मला आपणास सांगण्यास आनंद होत आहे की, हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सन 2017 व सन 2019 या वर्षांमध्ये 50 कोटी झाडे लावण्यात येत आहेत.

    १५. माझ्या शासनाने ज्यांना स्वत:ची कार्यालयीन जागा नाही अशा ग्रामपंचायतींकरिता, कार्यालयीन इमारती बांधण्यासाठी निधी पुरविणाऱ्या,कै. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांमधील सुमारे4250 ग्रामपंचायतींना लाभ होईल.

    १६. माझ्या शासनाने राज्याचा शीघ्र गतीने विकास करण्यासाठी अनेक महत्वाची धोरणे घोषित केली आहेत. त्यामध्ये अवकाश व संरक्षण क्षेत्र धोरण, काथ्या उद्योग धोरण, विद्यमान औद्योगिक धोरणाचा विस्तार, महाराष्ट्र विद्युतचालित वाहन निर्मिती धोरण, औद्योगिक संकुल धोरण,एकात्मिक लॉजिस्टिक पार्क धोरण, नवीन वस्त्रोद्योग धोरण आणि वित्त तंत्रज्ञान धोरण, यांचा समावेश आहे. या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास व राज्यातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत होईल.

    १७. वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जीवन विकास योजनेअंतर्गत एलपीजी गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच, त्यांना सौर उर्जानिर्मिती करणारे कीट आणि दुभती जनावरे यांचे वाटपही करण्यात आले आहे.

    १८. माझे शासन सार्वजनिक आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहे. येत्या महिन्यापासून, राज्यातील कर्करोग रूग्णांना, जिल्हा रूग्णालयात मोफत केमोथेरपी देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात, ही सुविधा नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या दहा जिल्ह्यांत उपलब्ध करून देण्यात येईल.

    १९. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने, भारतीय सैन्य दलातील ज्या जवानांनी सेवा बजावताना आपले प्राण गमावले आहेत. अशा जवानांच्या कायदेशीर वारसांना नोकऱ्या देण्याचे ठरविले आहे. तसेच, त्या जवानांच्या विधवांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून चालवण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल.

    २०. बंधु-भगिनींनो, माझे शासन, राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी अत्यंत कटिबद्ध आहे. एक प्रभावशाली, प्रगत आणि संवेदनशील महाराष्ट्र घडविण्यात, शासनाबरोबर सहभागी होण्यास मी आपणा सर्व नागरिकांना आवाहन करतो. पुन्हा एकदा, महाराष्ट्र दिनाच्या या प्रसंगी तमाम जनतेला माझ्या मनापासून शुभेच्छा.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !!