बंद

    ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन राजा माने यांचे पुस्तक जिवंत व प्रेरणादायी : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: March 30, 2022

    ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
    राजा माने यांचे पुस्तक जिवंत व प्रेरणादायी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या ७५ व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजा माने लिखित ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.३०) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाला माजी राज्यपाल डॉ डी.वाय पाटील, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लेखक राजा माने, रेखाचित्रकार नितीन खिलारे व बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.

    देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे तसेच महाराष्ट्र राज्य देखील आपले हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. अश्यावेळी राज्यातील ७५ प्रतिभावंत व्यक्तींचे व्यक्तीचित्रण करणे व त्याला सुंदर रेखाचित्रांची जोड देणे हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. राजा माने यांनी आपल्या पुस्तकातून राज्यातील हिरेही दाखवून दिले आणि अमृतही दिले असून त्याचे रसपान वाचकांनी करावे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    पुस्तक विकत घेऊनच वाचावे

    पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुस्तकाच्या प्रती उपस्थितांना मोफत देण्याच्या प्रथेला विरोध करताना प्रत्येकाने पुस्तक विकत घेऊनच वाचावे अशी आग्रही सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी केली. यावेळी राज्यपालांनी स्वतः पैसे देऊन ‘ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ या पुस्तकाची प्रत विकत घेतली.

    आजकाल समाजात कर्तृत्व व नम्रता हे गुण एकत्र अभावाने आढळतात असे मत व्यक्त करताना राजा माने यांनी प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनावरील पुस्तक दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर, महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी असलेली सुसंवादाची परंपरा पुन्हा यावी असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

    यावेळी चित्रकार नितीन खिलारे यांनी काढलेल्या व पुस्तकात समाविष्ट केलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीचित्रांच्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली. सोलापूर येथील शिवरत्न शेटे व संतोष ठोंबरे यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले.