26.05.2026: राज्यपालांच्या हस्ते ‘टीबी मुक्त मुंबई’ मोहिमेचा शुभारंभ
26.05.2026: ‘टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई’ मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे करण्यात आला. राज्यपालाच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा देखील सत्कार करण्यात आला. लोकभवनच्या पुढाकाराने आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई’ मोहिमेच्या उदघाटनला मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार डॉ ज्योती गायकवाड आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, मार्केट व गार्डन समितीचे उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉक्टर्स, आशा सेविका तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘टीबी मुक्त मुंबई’ च्या अभियानावर आधारित माहिती पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीला राज्यपालांनी धारावी येथील एकनाथराव गायकवाड आरोग्य केंद्र येथे क्षयरोग अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका यांचेशी संवाद साधला तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण केले. या कार्यक्रमात राज्यपालांनी ३० क्षयरुग्णांच्या पोषण पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. त्याबद्दल महापौर रितू तावडे यांनी राज्यपालांना निक्षय मित्र प्रमाण पत्र प्रदान केले.