बंद

    श्री. सी. पी. राधाकृष्णन

     

    C.P. Radhakrishnan, Hon'ble Governor of MaharashtraMadam

     

     

    महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचा संक्षिप्त परिचय

    श्री चंद्रापुरम पोन्नुसामी राधाकृष्णन यांनी दिनांक 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते जवळपास दिड वर्षे झारखंडचे राज्यपाल होते. झारखंडचे राज्यपाल असताना भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल या पदांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी नियुक्त केले होते.

    श्री राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूर, तमिळनाडू येथे झाला आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. बाल वयातच स्वयंसेवक म्हणून त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला.

    सन 1974 साली ते भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य झाले. श्री राधाकृष्णन वस्त्रोदयोग क्षेत्रातील यशस्वी निर्यातदार होते.

    सन 1996 साली राधाकृष्णन यांची तामिळनाडूमध्ये भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. सन 1998 साली ते पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 साली ते तेथूनच पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले.

    आपल्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.

    सन 2004 साली, श्री राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते.

    सन 2004 ते 2007 या काळात राधाकृष्णन यांनी तामिळनाडू प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळले. या पदावर असताना त्यांनी 93 दिवसांची ‘रथयात्रा’ काढली होती. या रथयात्रेने १९००० किमी प्रवास केला. भारतातील सर्व नद्यांना जोडावे, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावे, समान नागरी कायदा लागू करावा, अस्पृश्यता निर्मूलन आणि अंमली पदार्थांचे उच्चाटन व्हावे या मागण्यांसाठी ही रथयात्रा काढली होती. त्यानंतर देखील त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी दोन पदयात्रांचे नेतृत्वही केले.

    सन 2016 मध्ये डॉ. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्ड, कोची या सार्वजनिक उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी चार वर्षे सांभाळले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील कॉयरची निर्यात 2532 कोटी रु. या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. सन 2020 ते 2022 पर्यंत ते भाजपचे केरळ राज्याचे अखिल भारतीय प्रभारी होते.

    दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व 24 जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील आपल्या कार्यकाळात राधाकृष्णन यांनी जवळपास सर्व जिल्हयांना भेटी दिल्या व तेथील जनसामान्यांशी संवाद साधला. उच्च शि क्षणातील सकल नोंदणी वाढ वि ण्यासाठी व आ दि वासी मुला- मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी त्यांनी विद्यापीठांच्या माध्यमातून ठोस पावले उचलली. आदिवासी विकास योजनांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

    उत्तम क्रीडापटू असलेले, राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चाम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे.

    श्री राधाकृष्णन यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, बेल्जियम, हॉलंड, तुर्की, चीन, मलेशिया, सिंगापूर, तैवान, थायलंड, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, इंडोनेशिया आणि जपान या देशांना भेटी दिल्या आहेत.

    दिनांक १२ सप्टेंबर 2025 रोजी राधाकृष्णन यांनी भारताच्या उप राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.