22.04.2025- भारतीय शेतीला शाश्वत व आर्थिक लाभाची करण्यात कृषि विद्यापीठांची महत्वाची भूमिका – मा. राज्यपाल

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 38 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न
भारतीय शेतीला शाश्वत व आर्थिक लाभाची करण्यात कृषि विद्यापीठांची महत्वाची भूमिका
– मा. राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन
वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषि क्षेत्र अधिक अडचणीत येत असतांना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचे ज्ञान आणि तुमची जिद्द हीच तुमची प्रेरणा आहे. जिचा प्रकाश तुमच्या पुढील जीवन प्रवासात मार्गदर्शक ठरेल. आजपासुन तुम्ही नव्या प्रवासाची सुरुवात करत आहात. भारतीय शेतीला शाश्वत व आर्थिक लाभाची करण्यात कृषि विद्यापीठाची महत्वाची भुमिका असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती श्री. सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 38 व्या पदवीप्रदान समारंभात अध्यक्षस्थानावरुन स्नातकांना उदद्ेशून मार्गदर्शन करताना राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन हे बोलत होते. यावेळी कृषि मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना.अॅड. माणिकराव कोकाटे, विधानपरिषदेचे सभापती ना.श्री. राम शिंदे, नवी दिल्ली येथील कृषि शिक्षण व संशोधन विभागांतर्गत असलेल्या कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, राज्यपालांचे ए.डी.सी. श्री. अभयसिन्हा देशमुख, अधिष्ठाता (कृषि) डॉ. साताप्पा खरबडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. प्रदिप इंगोले, श्री. दत्तात्रय उगले, श्री. गणेश शिंदे, श्री. संजीव भोर, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, नियंत्रक श्री. सदाशीव पाटील आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव श्री. हेमंत सोनार उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की आजचा दिवस हा सर्व पदवीधारक आणि पदक विजेत्यांसाठी अत्यंत आनंदाचा आहे. तुम्ही केवळ पदवीधर नाही, तर भारतीय कृषि क्षेत्राचे भविष्य आहात. तुम्ही ज्ञान आणि कौशल्याने सज्ज आहात आणि समोरील संधी व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास सक्षम आहात. जे ज्ञान तुम्ही प्राप्त केले आहे ते प्रात्येक्षिकात उतरविण्याचा प्रयत्न करा. सन 2047 विकसीत भारतामध्ये कृषिचा मोठा वाटा राहणार आहे. हवामान बदलांना तोंड देणार्या पिकांच्या जाती विकसित करून, सेंद्रिय शेती, समग्र अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाचा प्रसार करून कृषि विद्यापीठे हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यात आणि उत्पादकता वाढवण्यात मदत करू शकतात. कृषि पदवीधरांनी स्थानिक घटक लक्षात घेऊन पिकांचे वाण विकसित करावे. विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि अचूक शेतीसाठी वापरण्यात येणार्या साधनांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकर्यांना योग्य वेळी आवश्यक माहिती पुरविणे गरजेचे आहे. कृषि प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन आणि कृषि मूल्य साखळी विकसित करणेही महत्वाचे आहे. कृषिच्या विद्यार्थ्यांनी शेती फायदेशीर होण्यासाठी आणि शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्य शासन शेतीतील नविन उपक्रम, उद्योजकता आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आर्थिक सहकार्य, प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा प्रदान करणार्या विविध कार्यक्रमांद्वारे शेती क्षेत्रातील पुढील नेतृत्व घडविण्याचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. कृषि क्षेत्राची आणि विद्यापीठाच्या गरजा लक्षात घेण्यासाठी तीन दिवस विद्यापीठात मुक्काम करणार असल्याचे श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले. विद्यापीठाने शेतकर्यांच्या फायद्यासाठी विविध पिकांच्या जाती आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रशंसनीय कार्य केले आहे. डिजिटल शेतीच्या क्षेत्रात विद्यापीठाची झालेली प्रगती ही एक भूषणावह बाब आहे. विद्यापीठाचा हा पुढाकार शेतकरी समुदायापर्यंत विकसित झालेली तंत्रज्ञान आणि माहिती सहज आणि आकर्षक पद्धतीने पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी काढले.
याप्रसंगी राज्याचे कृषि मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना.अॅड. माणिकराव कोकाटे म्हणाले की वातावरणतील बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कृषि क्षेत्रात आमुलाग्र बदल करून नवे तंत्रज्ञान स्विकारावे लागेल. कमी खर्चात नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक उत्पादन घेण्याचे प्रयत्न करावे लागतील. नव्या कल्पना, सेंद्रिय शेती, कृषि यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती पद्धतीत बदल घडवून आणावे लागतील. फलोत्पादन आणि उत्तम गुणवत्तेचे उत्पादन करून निर्यातीवर भर देणेही गरजेचे आहे. अधिक उत्पादनासाठी वारेमाप खते व किटकनाशकांच्या वापरामुळे समाजाचे आरोग्य बिघडत चालले आहे. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. अंशमुक्त कृषि उत्पादनाकडे आता जाणे गरजेचे आहे. विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तारामध्ये भरीव योगदान द्यावे आणि कृषि पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कृषि क्षेत्राच्या उन्नतीसाठी करावा असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले. राज्य शासन विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यामाध्यमातून शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायमच कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रमुख पाहुणे डॉ. संजय कुमार आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना उद्देशुन म्हणाले की प्रिय पदवीधरांनो, सन 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.7 अब्ज होईल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी आपल्याला अन्नधन्य उत्पादनात 70 टक्के वाढ करावी लागेल. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणजे आता कृषि उद्योजकतेची जाहिरात करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कार्यक्षम अशी मूल्य साखळी तयार करा. कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमॅन्युफॅक्चरिंग हब तयार करा. ब्रॅण्डिंगला प्रोत्साहित करा. बाजारपेठेत प्रवेशासाठी विविध आउटलेट किंवा कृषि उत्पादनांचे मॉल तयार करा. तुम्ही नेहमी आपल्या आवडीचा पाठपुरावा केला पाहिजे त्यासाठी उद्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निर्भयपणे नाविन्याचा पर्याय निवडा. अॅग्री उत्पादन मॉल आणि अॅग्रो इको टुरीझम, कृषि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सन 2047 पर्यंत विकसित भारताला हातभार लावून आपल्या अल्मा मॅटरला चमकदार बनवा. प्रत्येक घराचे पोषण करणार्या शेतकर्यांना उन्नत करण्यासाठी आपला मनापासून प्रयत्न असला पाहिजे याची जाणीव ठेवा. ते पुढे म्हणाले की आम्हाला शेतीमध्ये जास्तीत जास्त यांत्रिकीकरण करण्याची गरज आहे म्हणून आता नाविन्यपूर्ण आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करण्याची आणि मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मोठ्या कल्पनांचा पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे. या प्रयत्नांबरोबरच पुन्हा एकदा विशेष हरितक्रांती घडवून आणली तरच आपण भविष्यात सर्वांना अन्न उपलब्ध करु शकु असे यावेळी ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. शरद गडाख विद्यापीठ अहवाल सादर करताना म्हणाले की विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शेतकर्यांना उपयोगी ठरणार्या 1866 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 311 वाणांची निर्मिती व 51 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. राहुरी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या प्रमुख 8 पीकांच्या उदा. ऊस, डाळिंब, हरभरा, रब्बी ज्वारी, कांदा, भात, लिंबू व बाजरी वाणांचे आर्थिक विश्लेषण केले असता या 8 पिकांच्या वाणामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळमानाने एकुण रु. 2,40,188 कोटी व निव्वळ 32,206 कोटी रुपये इतक्या महसुली उत्पन्नाची भर पडली आहे. विद्यापीठाने बदलत्या हवामानाला अनुरुप असे शेतकरीभिमुख संशोधन केलेले आहे.
सन्माननीय राज्यपाल तथा कृषि विद्यापीठाचे कुलपती श्री. सी.पी. राधाकृष्णन यांनी यावेळी 40 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 331 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4,830 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 5,201 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीप्रदान सन 2023-24 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. प्रज्ञा खर्डे, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. प्राची महाकाळ, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला चि. दर्शन सुर्यवंशी यांनी सुवर्णपदक मिळविले. यावेळी पीएच.डी.च्या 8 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदव्युत्तर पदवीच्या 19 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदवीच्या 9 विद्यार्थ्यांना सुवर्ण व दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पदव्युत्तर व कृषि अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थीनींच्या वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदन आणि दिप प्रज्वलनाने करण्यात आली. पदवीप्रदान समारंभाला अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. के.पी. विश्वनाथा, डॉ. एम.सी. वाष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, माजी आ.श्री. चंद्रशेखर कदम, डॉ. हरी मोरे, श्री. तानाजी धसाळ, कृषिभुषण सुरसिंग पवार, विद्या परिषद सदस्य, मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व डॉ. भगवान देशमुख यांनी केले.