27.06.2025:- सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेने कार्य करून जीवनात यशस्वी व्हा -राज्यपाल

सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेने कार्य करून जीवनात यशस्वी व्हा
-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
सिम्बायोसिस विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संप्पन्न
पुणे दि.२७ – सात्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना आणि निश्चित उद्दीष्ट या त्रिसूत्रीच्या आधारे स्नातकांनी जीवनात यश संपादन करावे. भविष्यातील वाटचाल करतांना निश्चित उद्दीष्ट ठेवून त्याला कठोर परिश्रम, एकाग्रतेची जोड दिल्यास आणि निराश न होता प्रयत्नरत राहिल्यास निश्चितपणे यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.
सिम्बायोसिस विद्यापीठ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीप्रदान समारंभात राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र. कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ.रामकृष्णन रामन, राज्यपालांचे प्रधान सचिव प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ.एम. एस शेजुळ आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, जीवनात थकवा येणे किंवा निराशा येणे स्वाभाविक आहे, पण तिथे थांबून चालणार नाही. जीवनात केलेला प्रत्येक प्रयत्न जीवनाला आकार देण्यासाठी उपयुक्त असतो, आनंद मिळविण्यासाठी असतो. आनंदी मन हे कार्यासाठी ऊर्जा देणारे आणि आपल्याला प्रेरित करणारे असल्याने आपण करीत असलेल्या कामाचा आनंद घेण्याची सवय ठेवावी. आतापर्यंत प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारे जीवनात यश संपादन करावे, अशा शुभेच्छा श्री.राधाकृष्णन यांनी दिल्या.
राज्यपाल पुढे म्हणाले,आज जगातील अनेक देश, विशेषतः ज्यांची लोकसंख्या वाढत आहे, ते कुशल मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. विद्यार्थ्यांनी ही संधी साधण्यासाठी तयार असले पाहिजे. महाराष्ट्रातील विद्यापीठांना जर्मन, फ्रेंच, जपानी, मँडरीन, स्पॅनिश, इटालियन आणि इतर भाषांमध्ये अल्प-मुदतीचे भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक नोकरीच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळेल. पुणे शहर वाहन उद्योग, माध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमुख केंद्र असल्याने विद्यार्थ्यांना इथे चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.
कुलपती डॉ. मुजुमदार म्हणाले, विद्यापीठ ‘वसुंधेव कुटुंबकम’ या ध्येयाने कार्य करीत असून विद्यापीठात विविध देशांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सारे विश्व एक कुटुंब आहे या भावनेनेच येथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे ते म्हणाले.
राज्यपालांच्या हस्ते,पदवी प्रदान समारंभात २२ देशातील ८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
प्र. कुलगुरू डॉ.येरवडेकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची व अभ्यासक्रमाची माहिती दिली.