बंद

    26.02.2026: डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार; निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी : राज्यपाल आचार्य देवव्रत

    प्रकाशित तारीख : February 27, 2026
    Governor presents the Lokmat Times Excellence in Health Care Awards

    डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार; निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी : राज्यपाल आचार्य देवव्रत

    नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज

    नागपूर, दि.२६ : दया, करुणा आणि सहिष्णू भावाने कार्य करत रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचे समाजावर मोठे उपकार आहेत असा गौरव करत निरोगी समाज घडविण्यासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.

    निरोगी समाजासाठी शुद्ध हवा, पाणी व मातीची गरज आहे त्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व समाज घटकांनी पुढे येण्याची गरजही राज्यपालांनी व्यक्त केली.

    आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर्सना राज्यपालांच्या हस्ते लोकमत टाईम्स एक्सलन्स इन हेल्थ केअर पुरस्काराचे वितरण येथील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.राज्यपालांच्या सुविद्य पत्नी दर्शनादेवी देवव्रत, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, लोकमत माध्यम समुहाचे प्रमुख विजय दर्डा, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, पद्मश्री चंद्रशेखर मेश्राम, आयएमएच्या अध्यक्ष मंजुषा गिरी आदी यावेळी उपस्थित होते.

    राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, देशात कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या कठीण काळात डॉक्टर, नर्स आणि वैद्यक व्यवसायातील सर्व घटकांनी जीवाची बाजी लावत रुग्णसेवेचे मोलाचे योगदान दिले. भारतीय संस्कृतीचा आधार असणाऱ्या वेदांमध्ये दुसऱ्यांप्रती सह वेदना भाव व्यक्त करणाऱ्या मानवतेला प्राधान्य दिले आहे. हाच मानवतेचा भाव वैद्यकीय क्षेत्रात दिसून येतो. आरोग्य सेवा मानवतेचे प्रतीक असल्याचे सांगून समाजात वेगाने वाढत असलेल्या रोगांच्या पार्श्वभूमीवर निरोगी समाज घडविण्यासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी असे राज्यपाल देवव्रत यांनी सांगितले.

    निसर्गाच्या जवळ जाणे हे निरोगी समाजाचे लक्षण असून निसर्गापासून लांब जाणे हे रोगी समाजाचे लक्षण आहे. पौष्टिक अन्न सर्वांना मिळाले पाहिजे मात्र चुकीच्या खानपान सवयीमुळे समाजात रोगांचे प्रमाण दिसत आहे. पौष्टिक व कसदार अन्नधान्य निर्मितीसाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शुद्ध हवा, पाणी व माती प्रत्येकाला मिळावी यासाठी नैसर्गिक शेती ही एक चळवळ बनली पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे त्यांनी व्यक्त केली.

    विजय दर्डा यांनी स्वागतपर भाषण केले.
    Governor presents the Lokmat Times Excellence in Health Care Awards