बंद

    24.02.2021 : समता फाउंडेशनच्या कार्याला राज्यपालांची शाबासकी

    प्रकाशित तारीख: February 24, 2021

    समता फाउंडेशनच्या कार्याला राज्यपालांची शाबासकी

    युगांडा व झिम्बाब्वेचे मानद वाणिज्यदूत सन्मानित

    समाजसेवा करण्याची संधी ईश्वर सर्वांना देत नाही. समाज सेवेसाठी धन, साधन सामुग्री तसेच सर्वांचे सहकार्य पाहिजे. सेवाकार्यात विघ्नेही अनेक येतात. परंतु अंतिमतः सेवाकर्त्याला आत्मिक शांती आणि समाधान मिळते. अजंता फार्मा तसेच समता फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागात आरोग्यसेवा, कुपोषण मुक्ती, शिक्षण या क्षेत्रात केले जात असलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहे, या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज संस्थेला शाबासकी दिली.

    समता फाऊंडेशनचे विश्वस्त तसेच युगांडा देशाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत मधुसूदन अग्रवाल यांचा राज्यपालांच्या हस्ते करोना काळातील जनसेवेबद्दल राजभवन येथे बुधवारी (दि. २४) सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    राज्यपालांच्या हस्ते झिम्बाब्वेचे मानद वाणिज्यदूत तसेच समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांचा देखील प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

    समता फाऊंडेशनच्या वतीने राज्यात आणि विशेषतः आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये अन्नधान्य, भोजन, मास्क, सॅनिटायझर, औषधी वाटप यांसह आदिवासी मुलांना कॉम्पुटर प्रशिक्षण आदी अनेक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती संस्थेचे अधिकारी तानाजी गोंड यांनी दिली.

    रवि अग्रवाल, रिचा अग्रवाल, दिपक लोया, प्रियंका घुले, विशाल सरिया, आयुष अग्रवाल यांचा देखील यावेळी प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला.