22.03.2026: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातील निसर्गोपचार आश्रमाच्या 81 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला केले संबोधित
उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातील निसर्गोपचार आश्रमाच्या 81 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला केले संबोधित
निसर्गोपचार आणि योगसाधना यांची निरोगी भारताच्या उभारणीतील भूमिका उपराष्ट्रपतींनी केली अधोरेखित
निरोगी भारतासाठी निसर्गोपचार आश्रमासारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची: उपराष्ट्रपती
खऱ्या आनंदासाठी साधेपणा आणि संतुलनाचा अंगिकार करा: उपराष्ट्रपती
Posted On: 22 MAR 2026 3:38PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज उरुळीकांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रमाच्या 81 व्या वर्धापनदिन सोहळ्याला संबोधित केले.
ज्यांनी या आश्रमाची संकल्पना मांडली ते महात्मा गांधी आणि ज्या शेतकऱ्याने या उदात्त कार्यासाठी जमीन दान केली, त्या दोघांविषयी देश कृतज्ञ आहे, अशा भावना उपराष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांनी या आश्रमाचे वर्णन केवळ एक संस्था म्हणून नव्हे, तर निसर्गाशी सुसंगत अशा साध्या आणि शिस्तबद्ध जीवनाच्या महात्मा गांधींच्या दृष्टीकोनातून प्रेरित असलेली एक चळवळ, एक तत्त्वज्ञान आणि जीवनपद्धती असे केले.
निसर्ग हा सर्वात मोठा उपचारकर्ता आहे असे गांधीजी मानत असत असे सांगत, खरे आरोग्य, साधेपणा, शिस्त आणि निसर्गाशी सुसंगत जीवन जगण्यात दडलेले आहे, यावर राधाकृष्णन यांनी भर दिला.
जीवनशैलीशी संबंधित आजारांचा वाढता भार अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, आश्रमाचा संदेश आज पूर्वीपेक्षा जास्त प्रासंगिक आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे, तर ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणाची एक संपूर्ण अवस्था आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी लोकांना संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, मानसिक शांतता आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली अंगिकारण्याचे आवाहन केले.
झारखंड आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपल्या कार्यकाळाची आठवण करून देताना उपराष्ट्रपती म्हणाले की, त्यांना आदिवासी समुदायांमधील स्वदेशी आणि नैसर्गिक उपचार पद्धतींच्या समृद्ध परंपरेचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली. निसर्ग आणि पारंपरिक ज्ञानावर आधारित असलेल्या या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या पद्धती, सर्वांगीण आरोग्य सेवेतील भारताच्या सखोल सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक विद्वत्तेचे दर्शन घडवतात, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पारंपरिक औषध पद्धतींना जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रतिबंधात्मक आणि सर्वांगीण आरोग्य सेवेत आयुष संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असून, देशातील वैद्यकीय आणि ‘निरामयत्व’ पर्यटनाच्या वाढीस हातभार लावत आहेत. योग आणि निसर्गोपचार हे आधुनिक वैद्यकशास्त्राला पर्याय नसून ते शक्तिशाली पूरक आहेत, यावर त्यांनी भर दिला. भारताच्या पारंपरिक आरोग्य पद्धतींचे त्यांनी जगाला मिळालेली ‘अमूल्य भेट’ असे वर्णन केले.
आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक यशामध्ये आनंद शोधतात, परंतु खरे समाधान हे शांतता, संतुलन आणि जीवनातील सुसंवादातून मिळते, असे उपराष्ट्रपती म्हणाले. व्यक्ती निरोगी असेल तर कुटुंब सुदृढ होते; कुटुंब सुदृढ असेल तर समाज समृद्ध होतो; आणि समाज समृद्ध झाला तरच राष्ट्र प्रगती करते.
देश ‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करत असताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निसर्गोपचार आश्रमसारख्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी उपराष्ट्रपतींनी आश्रमात महात्मा गांधी आणि मणिभाई देसाई यांना पुष्पांजली अर्पण केली तसेच निसर्गोपचार आश्रमाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नारायण हेगडे लिखित ‘‘सीक्रेट्स ऑफ अवर हॅपिनेस” या पुस्तकाचे प्रकाशन केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
***
राधिका अघोर/शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर