बंद

    17.02.2021 : एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात राज्यपालांचे प्रतिपादन

    प्रकाशित तारीख: February 17, 2021

    एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात राज्यपालांचे प्रतिपादन

    ‘नवा भारत मातृशक्तीचा असेल’

    गेल्या काही वर्षांमध्ये नव्या भारतातील चित्र पूर्णपणे बदलले असेल. प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत. कुलपती या नात्याने आपण उपस्थित असलेल्या प्रत्येक दीक्षांत समारोहात ५ सुवर्णपदके मुलांना जात असतील, तर ५० सुवर्ण पदके मुली पटकावतात. त्यामुळे नवा भारत मातृशक्तीचा असेल, भगिनीशक्तीचा असेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ७० वा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत बुधवारी (दिनांक १७) संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटन मंत्री मुकुल कानिटकर, विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्रकुलगुरू विष्णु मगरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    दीक्षांत समारोहात स्नातकांना उद्देशून मातृ देवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव हा उपदेश दिल्या जातो याचे स्मरण देऊन राज्यपाल म्हणाले की या उपदेशामध्ये मातृशक्तीला अग्रमान दिलेला आहे. आपल्या देशात कुमारी पूजा केली जाते. बंगालमध्ये तर सुनेला देखील बहुमाता म्हटले जाते, ही भारताची परंपरा आहे.

    प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी, सरस्वती व दुर्गेचे रूप असून मुलींमध्ये सेवाभाव, वात्सल्य, त्याग व समर्पण भाव निसर्गदत्त असतो. त्यामुळे प्रत्येकाने मातृशक्तीला जागृत केल्यास आपल्याला सर्व क्षेत्रात सफलता मिळेल व त्यातून समाज व देश प्रगती करेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    एसएनडीटी विद्यापीठाचे संस्थापक महर्षी कर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन करून राज्यपाल म्हणाले, शिक्षण केवळ अर्थार्जनासाठी न राहता ते मूल्यांवर आधारित असावे. स्नातकांनी आपल्या डोळ्यांपुढे उच्च ध्येय ठेवून तसेच नीतीमूल्ये, सदाचार, त्याग व सेवाभाव अंगीकार करून वाटचाल केल्यास त्यांच्या वैयक्तिक उत्कर्षासह राष्ट्र उत्कर्ष साधल्या जाईल.

    दीक्षांत समारोहात विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यशास्त्र, आंतरशाखीय अध्ययन या शाखांमधील १६४८३ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका व आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी १२० विद्यार्थ्यांना ७३ सुवर्ण पदके, एक रौप्य पदक व २१८ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

    कुलगुरू शशिकला वंजारी यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले; तर परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. सुनील वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.