बंद

    12.08.2026 एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ११वा विद्यारंभ समारंभ संपन्न

    प्रकाशित तारीख : August 12, 2026
    12.08.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथील एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ११ वा विद्यारंभ समारंभ विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद मंडपम सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे संस्थापक व कुलगुरू डॉ. विश्वनाथ कराड, राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक जे. डी. लक्ष्मीनारायण, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, उषा कराड, कुलगुरू प्रा. राजेश एस., कार्यकारी संचालक डॉ. सुनिता कराड तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

    एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ११वा विद्यारंभ समारंभ संपन्न

    नवोन्मेष, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये आत्मसात करा– राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    ▪️ विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्तीची भूमिका महत्त्वाची; विद्यापीठांना संशोधन समाजोपयोगी करण्यावर भर देण्याचे आवाहन

    पुणे, दि. १२ : आजच्या गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पारंपरिक शैक्षणिक शाखांच्या सीमा ओलांडणारे बहुविषयक शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्ये, नवोन्मेष, चिकित्सक विचार आणि नैतिक मूल्ये आत्मसात करून भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात आयोजित ११व्या विद्यारंभ समारंभात ते बोलत होते. यावेळी एमआयटी समूह संस्थांचे संस्थापक व कुलपती डॉ. विश्वनाथ डी. कराड, महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक जे. डी. लक्ष्मीनारायण, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, उषा कराड, कुलगुरू प्रा. राजेश एस., कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड आदी उपस्थित होते.

    विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकारण्यात विद्यापीठे आणि युवा शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करीत राज्यपाल वर्मा म्हणाले, पूर्वीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना विविध विषय एकत्रितपणे शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. परस्परांशी जोडलेल्या आजच्या जगात बहुविषयक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना गुंतागुंतीच्या प्रश्नांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहता येते आणि त्यावर आत्मविश्वासाने उपाय शोधता येतात.

    कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, क्वांटम संगणन, जैवतंत्रज्ञान, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. मात्र तंत्रज्ञानासोबत नैतिकता, मूल्ये आणि करुणेचा अभाव असल्यास हीच तंत्रज्ञाने विनाशकारी ठरू शकतात. विज्ञानाचा वापर मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, इतर मानवांच्या विनाशासाठी नव्हे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरासोबत मानवता आणि करुणा जपणे अत्यावश्यक आहे, असे श्री.वर्मा म्हणाले.

    संशोधनाचा समाजाला उपयोग व्हावा
    विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर शिकविण्यासोबतच नवोन्मेष, संशोधन आणि समाजोपयोगी उपाय विकसित करण्यासाठी प्रेरित करावे. त्यांच्यात सर्जनशीलता, चिकित्सक विचार, नैतिक नेतृत्व आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती विकसित करावी. युवकांनी केवळ रोजगार मिळविण्याची आकांक्षा न बाळगता नवोन्मेषक, उद्योजक, संशोधक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणारे बनण्याची आकांक्षा ठेवावी. उच्च शिक्षणात उद्योजकता आणि सामाजिक जबाबदारीला महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपाल श्री.वर्मा यांनी व्यक्त केली.

    विद्यापीठांनी उद्योग क्षेत्राशी भागीदारी, आंतरराष्ट्रीय सहकार्य, इनक्युबेशन केंद्रे आणि स्टार्टअप परिसंस्था अधिक मजबूत करण्याची गरज आहे. विद्यापीठांमध्ये, विशेषतः कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. संशोधनातून निर्माण झालेल्या कल्पनांचे व्यावहारिक आणि समाजोपयोगी उपायांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. समाजाच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला हातभार लावण्यासाठी विद्यापीठांनी काही गावे दत्तक घेऊन तेथील विकासासाठी तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही राज्यपालांनी केले.

    विद्यारंभ समारंभ हा केवळ परिचयाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठ्या युवा लोकसंख्येपैकी एक आहे. या लोकसंख्यात्मक सामर्थ्याचे रूपांतर राष्ट्रनिर्मितीच्या शक्तीत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करताना भारताच्या समृद्ध सभ्यतागत मूल्यांशी आणि ज्ञानपरंपरेशी जोडलेले राहणेही आवश्यक आहे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले. नव्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध ज्ञानशाखांमध्ये सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना पारंपरिक चौकटींपलीकडे विचार करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

    मोठी स्वप्ने पाहा, परिश्रमपूर्वक काम करा, यश मिळाल्यावर नम्र राहा आणि संकटांच्या काळात खंबीरपणे उभे राहा, बुद्धिमत्तेने प्रश्न विचारा, जिज्ञासा कायम ठेवा आणि शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक यशासाठी न करता समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी करा, असा संदेश श्री.वर्मा यांनी विद्यार्थ्यांना दिला.

    एमआयटी समूह संस्थांचे संस्थापक व कुलपती डॉ. विश्वनाथ डी. कराड यांनी आपल्या मनोगतात एमआयटीच्या स्थापनेपासून आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षणाच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याच्या प्रेरणेतून एमआयटीची उभारणी झाल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, मूल्ये, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची जोड देऊन सक्षम व जबाबदार नागरिक घडविणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

    प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी प्रास्ताविकात एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाची शैक्षणिक वाटचाल, विविध उपक्रम आणि भविष्यातील उद्दिष्टांची माहिती दिली.