बंद

    10.02.2025 : संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन संपन्न

    प्रकाशित तारीख: February 10, 2025
    10.02.2025 : संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन संपन्न

    संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन संपन्न

    समाजात प्रेम, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    एकीकडे मनुष्य विज्ञान – तंत्रज्ञान, उद्योग व व्यवसायात प्रगती करीत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक व भावनिक स्तरावर अशांत होत आहे. अश्यावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनी समाजात प्रेमभावना, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे करीत असलेले कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

    ‘वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता व सद्भावना’ या ब्रह्मकुमारी संस्थेच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या जागतिक अभियानाचे राज्यातील उदघाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. १०) राजभवन मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    कला आणि कलाकारांच्या माध्यमातून तरुण पिढीला भारताच्या संस्कृती आणि सनातन मूल्यांशी जोडणे हा सदर अभियानाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

    स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही. परंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे असल्याचे सांगताना ब्रह्मकुमारीसंस्था ध्यान व राजयोग यांच्या माध्यमातून प्रेम व शांतता या प्राचीन मूल्यांना नव्या पिढीपुढे आणण्याचे कार्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

    आज मुक्त व्यापारामुळे जग लहान गाव झाले आहे. व्यापार वाढला आहे, त्यातून ग्राहकाचा फायदा होत आहे. परंतु अनेक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे तणाव वाढत असून अमेरिकेसारख्या देशात युवक बंदुकीने इतरांचे जीवन संपवत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःला ओळखून इतरांसाठी कार्य करीत नाही तोवर मनुष्य जीवन अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

    आज जीवन खूप गतिमान झाले आहे. अश्यावेळी ध्यानाच्या माध्यमातून चित्त स्थिर करता येते व सकारात्मक विचार अंगीकारता येतात, असे त्यांनी सांगितले.

    कलाकारांचे जीवन वरपांगी सुखाचे वाटत असले तरी त्यांना देखील अनेक भावनिक आर्थिक समस्या व संकटांना तोंड द्यावे लागते. जय आणि पराजय अश्या दोन्ही गोष्टींना धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने समबुद्धी विकसित करणे गरजेचे आहे असे राज्यपालांनी सांगितले. आपली कथनी आणि करणी यामध्ये अंतर असू नये असे त्यांनी सांगितले.

    जीवनात सत्ता आणि पैसा या गोष्टी देखील महत्वाच्या आहे परंतु त्याचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित काम करून देशाला बलशाली केले पाहिजे. देश बलशाली झाल्यानंतर प्रेम व सद्भावनेचा विचार जगाला दिल्यास त्याला लोक महत्व देतील असे राज्यपालांनी सांगितले.

    कलाकारांच्या जीवनात प्रेम, शांती व सद्भावना महत्वाची: पूनम ढिल्लन

    चित्रपट सृष्टी ही इतरांना आनंद देण्यासाठी व मनोरंजन करण्यासाठीनिर्माण झाली असली तरी देखील प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या समस्या असतात. त्यामुळे कलाकारांना आत्मिक शांतीसाठी प्रेम, शांतता व सद्भावनेची विशेष गरज असल्याचे अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनी यावेळी सांगितले. जीवनात इतरांशी तुलना नको कारण प्रत्येक जण अद्वितीय असतो असे त्यांनी सांगितले.

    पूर्वी लोक आजी आजोबांकडून संस्कार घेत. नवी पिढी या गोष्टींना मुकत आहे. परंतु सर्वांनी सकारात्मकता ठेवली पाहिजे व समाजात एकोप्याने राहिले पाहिजे असे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले.

    ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या गावदेवी मुंबई केंद्राच्या सहकार्याने आयोजित उदघाटन सोहळ्यामध्ये ब्रह्मकुमारी कला आणि सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा राजयोगिनी चंद्रिका दीदी व राजयोगिनी पूनम दीदी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

    ब्रह्माकुमारी श्रेया यांनी सामूहिक ध्यान करवले तर इंडियन आयडॉल मधील गायक हरीश मोयाल यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील कलाकार, विविध केंद्रांतील ब्रह्मकुमारी तसेच राजभवन येथील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.