बंद

    01.03.2025: शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट शक्य – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

    प्रकाशित तारीख: March 2, 2025
    01.03.2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील केपीबी हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत वर्षानिमित्त आयोजित सोहळा मुंबई येथे संपन्न झाला.  कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ श्रीमती सुदेश धनखड, महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, हिंदुजा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, श्रीमती हर्षा हिंदुजा व इतर मान्यवर उपस्थित होते.

    वृत्त क्र. 877 दि. 1 मार्च, 2025

    शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट शक्य
    – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

    · विकसित भारत केवळ स्वप्न नव्हे तर निश्चित साध्य

    · के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव

    मुंबई दि 1 :- नालंदा, तक्षशीला विद्यापीठांसारख्या संपन्न विद्याकेंद्रांची देदीप्यमान परंपरा आपल्याला लाभली आहे. ही परंपरा आपण जपली पाहिजे. शिक्षण आणि तंत्रज्ञान हे समाज परिवर्तन घडविणारे महत्त्वाचे घटक असुन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण जीवनाचा कायापालट घडविण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ‘विकसित भारत’ हे केवळ स्वप्न नसून निश्चित साध्य असल्याचेही उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले.

    यशवंतराव चव्हाण सेंटर येथे के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव कार्यक्रम झाला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी सुदेश धनखड, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, अध्यक्ष अशोक हिंदुजा, हर्षा हिंदुजा, पॉल अब्राहम, प्राचार्य चंद्रकला जोशी हे उपस्थित होते.

    उपराष्ट्रपती जगदीश धनखड म्हणाले, आपला देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशातील युवकशक्ती ही आपली मोठी जमेची बाजू आहे. अत्याधुनिक शिक्षण क्षेत्रात आपण अग्रेसर आहोत. नियोजन हा विकासाचा गाभा आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञान हे समाज परिवर्तन घडविणारे घटक असून भविष्यात उद्योग क्षेत्राने शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करून पायाभूत सुविधांबरोबरच दर्जेदार शिक्षणासाठीही योगदान द्यावे. कोणत्याही क्षेत्रातील संशोधन हे समाज उपयोगी असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्व अभ्यासाला अधिक महत्त्व द्यावे कारण शिक्षण ही आजीवन चालणारी प्रक्रिया असल्याचे श्री धनखड यांनी सांगितले.

    उपराष्ट्रपती धनखड यांनी हिंदुजा ग्रुपच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशंसोद्गगार काढले. श्री धनखड म्हणाले, हिंदुजा ग्रुपचे विविध क्षेत्रातील कार्य प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. शिक्षण संस्था गुरुजनांच्या योगदानामुळे नावारूपाला येतात ही परंपरा हिंदुजा ग्रुपने जपली आहे. समाजसेवेचा वसाही हिंदुजा ग्रुपने जपला आहे.

    प्रास्ताविकात अध्यक्ष अशोक हिंदुजा यांनी हिंदुजा ग्रुपच्या विविध क्षेत्रातील कामांची माहिती दिली. हिंदुजा ग्रुप ने सुरुवातीपासूनच समाजसेवा आणि समाज विकासावर भर दिला असून शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात संस्थेने उल्लेखनीय कार्य केले असल्याचे श्री हिंदुजा यांनी सांगितले.

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमाअंतर्गत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी वृक्षारोपण केले.