बंद

    सामाजिक योगदानातूनच देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: December 25, 2019

    अंतिम दिनांक:31.12.2019

    सामाजिक योगदानातूनच देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    कार्यकर्ता संमेलन समारोप कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती

    मुंबई, दि. 25 : सर्व समाजाच्या योगदानामुळेच देश प्रगती करत असतो. वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासींच्या विकासासाठी भरीव स्वरुपाचे काम केले जाते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज काढले.

    अंधेरी येथे वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र कोकण प्रांत यांच्यातर्फे आयोजित कार्यकर्ता संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. यावेळी नागालँडचे माजी राज्यपाल पट्टनभा आचार्य, वनवासी कल्याण आश्रमच्या कोकण प्रांत अध्यक्षा ठमाताई पवार, सचिव महेश देशपांडे, सुशील जाजू, मुकुंदराव चितळे, पंकज पाठक तसेच संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

    श्री.कोश्यारी म्हणाले, योगदान देण्यापेक्षा अनुदान कसे मिळेल याकडे काही संस्थाचा कल असतो. वनवासी कल्याण आश्रम ही सामाजिक संस्था मात्र यास अपवाद आहे. या संस्थेच्या योगदानामुळे आदिवासी मुलांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. देशाच्या प्रगतीमध्ये आदिवासी समाजाचे फार मोठे योगदान आहे. ऑलंपिक सारख्या खेळात पदक जिंकण्यात आदिवासी मुले पुढे असतात. मात्र, आदिवासींच्या विकासासाठी सर्वांनीच योगदान देणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.