बंद

    राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा — प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

    प्रकाशित तारीख: January 19, 2019

    महान्यूज

    दि. 19 जानेवारी, 2019

    राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन

    राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इतिहासाचा साक्षीदार

    आणि भविष्याची ऊर्जा — प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

    मुंबई दि. 19 : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच नवीन पिढीपर्यंत सिनेमाचा इतिहास पोहोचण्यासाठी एक नवे माध्यम उपलब्ध झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

    पेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले,खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्यासह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक शाम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित होते. याशिवाय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार, रणधीर कपूर, जितेंद्र, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पंडित शिवकुमार शर्मा, आशा पारेख, पूनम धिल्लोन, आमिर खान, ए.आर. रहमान परिणीती चोप्रा, कंगणा राणावत, दिव्या दत्ता, कार्तिक आर्यन, दिग्दर्शक सुभाष घई, करण जोहर, रोहित शेट्टी, मधुर भांडारकर, आदी उपथित होते.

    प्रधानमंत्री यावेळी म्हणाले, सिनेमा आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत.जे आपल्याला समाजात दिसते ते आपल्याला सिनेमात दिसते तसेच जे आपण सिनेमात पाहतो ते आपल्याला समाजात घडताना दिसते. आज भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून कलाकार पुढे येत असून हे कलाकार आपली कलाकृती समोर आणत आहेत. आजचा समाज बदलत असून बदलत्या समाजाचा सिनेमा हा आरसा आहे, सिनेमातून जसे प्रश्न कळतात तशी उत्तरेही मिळतात. पूर्वीच्या काळी एखादा सिनेमा बनविण्यासाठी किती वर्ष लागली यावरून त्याची ओळख व्हायची आता मोठमोठे सिनेमे कमीत कमी वेळात पूर्ण होतात यावरून आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे हे कळून येते. जेव्हा चांगली कला, कलाकार आणि साहित्यकार कलाकार एकत्र येतात तेव्हा चांगल्या कलाकृतींची निर्मिती होते असे मला वाटते. सध्याचा काळ हा सामाजिक माध्यमांचा काळ असल्याने कलाकारांनी आपण करीत असलेले काम, परिश्रम लोकांसमोर मांडल्याने या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. आज वेगवेगळ्या विषयावर आत्मचरित्रपट बनत असताना विज्ञान, प्रयोगावर आधारित सिनेमा बनणे आवश्यक आहे.

    भारतामध्ये चित्रपट ही संस्कृती आहे. चित्रपट जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे चित्रपट चळवळीचे महत्वाचे केंद्र असून या संग्रहालयादवारे चित्रपटाचे जतन करण्याबरोबरच समाजाचेच दस्ताऐवजीकरण करण्याचे महत्वूपर्ण काम होत आहे. चित्रपट जतनासाठी राष्टीय चित्रपट संग्रहालय करत असलेले प्रयत्न नक्कीच महत्वाचे आहेत.

    आज संपूर्ण भारतात जितके बॅटमॅनचे फॅन आहेत तितकेच बाहुबली चे फॅन आहेत यावरून भारतीय कलाकारांना, कलाकृतींना एक ग्लोबल ॲप्रोच आहे हे सिद्ध होते. सिनेमा हा मूकनायक म्हणजेच एखादा सायलेंट पावर आहे, यामध्ये एक वेगळीच ताकद आहे कारण सिनेमा मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधन, नवे विचार देखील प्रेक्षकांना देत असतो. हागणदारीमुक्त भारत, क्रीडा, महिला सक्षमीकरण,सामाजिक यासारख्या अनेक महत्वपूर्ण विषयावर आज माहितीपूर्ण नवीन कलाकृती बनत असून या विषयावरील सिनेमांना चांगला प्रेक्षक वर्गही लाभत असल्याचे दिसून असल्याचे प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.

    इज ऑफ डुईंग बिझनेसच्या धर्तीवर इज ऑफ सिनेमा

    सिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार तर मिळतोच पण यामुळे पर्यटन क्षेत्राचीही वृद्धी होत आहे. यापुढील काळात भारतात सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांना चित्रीकरणासाठी देशांतर्गत परवानगी तातडीने मिळावी यासाठी सिंगल विडों क्लिअरन्स सिस्टीम उभारण्यात येत आहे. लवकरच सिनेमा चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी एक विशेष वेबपोर्टल तयार करण्यात येणार असून एनएफडीसीबाबत परवानग्या मिळणार आहेत. इज ऑफ डूइंग बिजनेसच्या धर्तीवर आता इज ऑफ सिनेमाची संकल्पना यामुळे रुजण्यास मदत होईल असा विश्वास वाटत असल्याचेही ते म्हणाले.

    पायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार

    पायरसी रोखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. श्रम आणि सामर्थ्याचा अपमान पायरसीमुळे होतो. पायरसी रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून येणाऱ्या काळात पायरसी रोखण्यासाठी अधिक कडक नियम करण्यात येणार आहे.अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी सुद्धा स्वतंत्र सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही प्रधानमंत्री म्हणाले.

    भारतात होणार इंटरनॅशनल फिल्म समिट

    डाओसमध्ये इंटरनॅशनल बिझनेस समीट होते आता याच धर्तीवर आता भारतात देखील आंतरराष्ट्रीय चित्रपट परिषद घेण्याचा विचार केंद्र शासन करत आहे. येणाऱ्या काळात भारतात बनत असलेले सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट करण्यासाठी या परिषदेचा नक्की फायदा होईल.

    केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यावेळी म्हणाले, मुंबई ही सिनेमा सिटी असून आज सिनेमा सिटी मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सुरु होणे ही महत्वाची बाब आहे. सिनेमात काम करणारे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधनही करतात ही एक प्रकारची देशसेवाच आहे. येणाऱ्या काळात आपल्या भारतीय सिनेमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जसे कान्स फिल्म फेस्टिव्हल, ऑस्कर यासारख्या ठिकाणी सिनेमा प्रमोट करण्यासाठी केंद्र शासनामार्फत आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.

    संग्राहालयात व्हिज्युअल्स, ग्राफिक्स, मल्टीमिडीया व इंटरॅक्टीव एक्सीबीट्स आदींचा समावेश असलेल्या या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे. संग्रहालय दोन इमारतींमध्ये उभारण्यात आले असून नवीन संग्रहालय इमारत व 19 व्या शतकातील ऐतिहासिक गुल्शन महल येथे आहे. नवीन संग्रहालयात ‘गांधी आणि चित्रपट’, ‘मुलांचा चित्रपट स्टुडियो’, ‘तंत्रज्ञान, सर्जनशीलता व भारतीय चित्रपट’ आणि‘भारतातील चित्रपट’ अशी दालने आहेत. गुलशन महल ही भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वारसा इमारत असून ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचाच भाग आहे. याठिकाणी 9 दालन असून याद्वारे भारतीय चित्रपटाचा शंभर वर्षांचा प्रवास दर्शविण्यात आला आहे.यामध्ये प्राचीन कलाकृतीचे प्रदर्शन आणि कालक्रमानुसार भारतीय चित्रपटांचा प्रवास उलगडण्यात आला आहे.

    राष्ट्रीय संग्रहालयाची वैशिष्टये

    • भारतातील सिनेमासाठी प्रथमच खास संग्रहालयाची निर्मिती
    • 100 वर्षाच्या भारतीय सिनेमाच्या कारकिर्दीचे मूल्यांकन आणि विकास
    • कलाकृती आणि सस्मरणांचा विस्तृत संग्रह
    • पूर्णत: मुलांचा संवादात्मक चित्रपट स्टुडिओ
    • गांधी आणि सिनेमा यावरील विशेष प्रदर्शनी