बंद

    भारतीय अध्यात्मविचार सुखी जीवनाचा मूलमंत्र देणारे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: October 16, 2019

    भारतीय अध्यात्मविचार सुखी जीवनाचा मूलमंत्र देणारे

    – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    ‘कमिंग होम टू योअरसेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन

    मुंबई, दि. 16 : तणावविरहित, लोकोपयोगी चांगले जीवन कसे जगावे याचे दिशादर्शन करणाऱ्या भारतीय अध्यात्मशास्त्राकडे आज जग आकर्षित झाले आहे. अध्यात्मशास्त्र सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र देणारे असल्यामुळे ते जगापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    मुळच्या अमेरिकन असलेल्या व सध्या ऋषिकेशच्या डिव्हाईन शक्ति फाउंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या साध्वी भगवती सरस्वती यांनी लिहिलेल्या ‘कमिंग होम टू योअरसेल्फ’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. १६) राजभवन, मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाला परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती, साध्वी भगवती सरस्वती, ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अभिनेत्री दिया मिर्झा, पार्श्वगायक कैलाश खेर, तालवादक शिवमणी, उद्योगपती अशोक हिंदुजा व इतर मान्यवर उपस्थित होते.

    राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘कमिंग होम टू योअरसेल्फ’ हे पुस्तक म्हणजे स्वतःचा शोध आहे. हे केवळ पुस्तक नाही, तर जीवनाचे तत्व आणि मर्म आहे. साध्वी भगवती सरस्वती इंग्रजी भाषिक असल्या व त्यांचे पुस्तक इंग्रजी भाषेत असले तरीही त्यातील तत्वज्ञान विशुद्ध भारतीय असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

    ‘‘कमिंग होम टू योअरसेल्फ’ या संवादात्मक शैली असलेल्या पुस्तकामध्ये ‘हॉलीवूड ते होली वूड’, ‘जीवनाचे इतिकर्तव्य’, ‘यश आणि अध्यात्मिक विकास’, ‘अध्यात्मिक मार्ग’, ‘नकारात्मक विचारांपासून मुक्ती’, ‘भिती आणि चिंतेतून मुक्ती’, या विषयांवर चिंतन केले असल्याचे साध्वी भगवती सरस्वती यांनी सांगितले.

    शांती आपल्या स्वतःजवळच आहे. जगात कोठेही असलात तरी स्वतःच्या स्वरूपाशी जोडलेले रहा, असा संदेश चिदानंद सरस्वती यांनी दिला. यावेळी त्यांनी उपस्थितांना देश प्लास्टिकमुक्त करण्याची शपथ दिली.