बंद

    कर्करोगाचा सामना करण्यासाठी परिप्रेक्ष आराखडा तयार करण्याची राज्यपालांची सूचना

    प्रकाशित तारीख: March 28, 2019

    देशात मृत्युला कारणीभूत असलेल्या प्रमुख कारणांमध्ये कर्करोगाचा दूसरा क्रमांक लागतो. गेल्या तीन दशकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे आणि ते सातत्याने वाढत आहे.

    शासकीय संस्था, खासगी संस्था तसेच आशासकीय संस्थांनी एकत्रितपणे काम करून कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणार्‍या सोयीसुविधा सामान्य लोकांना परवडेल अश्या किमतीत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

    कर्करोगाच्या आव्हानाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधितांनी परिप्रेक्ष योजना तयार करावी, अशी सूचना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केली.

    कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन या कर्कग्णांसाठी कार्य करणार्‍या संस्थेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते भारतीय पोस्टाचे एक विशेष आवरण जारी करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

    पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे तर स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये, विशेषतः गडचिरोली सारख्या दुर्गम भागात गुटखा खाण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये देखील वाढले असल्याचे नमूद करून तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी संस्थेला कर्करुग्ण सेवाकार्यासाठी १ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

    कार्यक्रमाला कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे अध्यक्ष वाय. के. सप्रू, मुंबई विभागाच्या प्रधान पोस्ट मास्टर स्वाती पांडे तसेच उभय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.