बंद

    21.12.2020: राज्यपालांकडून ‘गऊ भारत भारती’ पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: December 21, 2020

    राज्यपालांकडून ‘गऊ भारत भारती’ पुरस्कार प्रदान

    गोसेवेचे कार्य कौतुकास्पद – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    मुंबई, दि. 21 : गाईची सेवा आणि संवर्धन करण्याचे कार्य अनेक व्यक्ती आणि संस्था करीत असून हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

    गऊ भारत भारती साप्ताहिकाचे संपादक संजय अमान यांच्यावतीने गऊ भारत भारती सन्मान, गऊ भारत भारती विशेष सन्मान पुरस्कार वितरण आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार राजभवन येथे आयोजित करण्यात आला. यावेळी गऊ भारत भारती साप्ताहिकाचे प्रकाशन आणि ‘जर्नी टू नो-थींग’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

    राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, गंगा, गीता आणि गायत्री हा भारताचा मूलमंत्र आहे. गोमातेच्या सन्मानाची परंपरा आहे. गाईची सेवा करणे ही श्रद्धेची भावना असून गाईच्या जतन व संवर्धनासाठी गऊ भारत भारती चांगले कार्य करीत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. कोरोनासारख्या महामारीशी आपण संघर्ष करीत आहोत. कोरोनाचे संकट संपूर्ण गेले नसून अद्यापही खबरदारी बाळगायला हवी. आतापर्यंत सर्व भारतीयांनी कोरोनाचा योग्यरित्या सामना केला आहे. यामुळे आपण कोरोनावर नक्कीच विजय मिळवू, असा विश्वासही श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केला.

    गऊ भारत भारती सर्वोत्तम सन्मान

    यावेळी गऊ भारत भारतीच्या वतीने सर्वोत्तम सन्मान म्हणून अभिनेता विवेक ओबेराय, राजेश मेहता, एस. पी. सेन, शामराव बाबर, डॉ.नवनाथ दुधाळ आदींचा सत्कार करण्यात आला.

    गऊ भारत भारती विशेष सन्मान

    गऊ भारत भारती विशेष सन्मानाने डॉ.खालिद शेख, डॉ.अजय साही, विजय केडीया यांचा स्मृतीचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला.


    कोरोना योद्धा पुरस्कार

    कोरोना योद्धा म्हणून झुबेर शेख, सरताज मेंहदी, सय्यद मेंहदी, प्रेम कुमार यांचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    ००००