बंद

    19.03.2023: ‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: March 20, 2023

    ‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, ता. १९ : नदी ही जीवनधारा आहे. विविध संतांनी नदीचे महत्व सांगितले आहे. देशातील या नद्यांचा सन्मान आणि संवर्धन व्हावे आणि ‘चला जाणूया नदीला‘ अभियान देशभर जावो, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आलेल्या ‘चला जाणूया नदीला‘ या अभियानाचा एक भाग म्हणून, सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना आणि खासदार श्रीमती हेमामालिनी यांचा नाट्यविहार प्रस्तुत ‘गंगा‘ हा नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, स्वामी चिदानंद सरस्वती, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

    राज्यपाल श्री.बैस म्हणाले, राज्यात या अभियाना अंतर्गत १ लाख ७८ हजार जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. राज्यात ८०० हून अधिक नद्या आहेत. या नद्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वाढते नागरीकरण, शहरीकरण यामुळे आपले नदीचे स्त्रोत नष्ट होत आहेत. आपली जैवविविधता आपण जपली पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

    मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या प्रेक्षणीय आणि श्रवणीय कार्यक्रमातून गंगा मिशन, जल संवर्धन, नदी स्वच्छता यासंदर्भात लोकसहभाग वाढविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्रात यासाठी गेल्या वर्षी महात्मा गांधी जयंती पासून व्यापक प्रयत्न सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. जल संवर्धन आणि नदी जोड प्रकल्प यासाठी राज्याने पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक व्यापक पद्धतीने हा विचार आपण पुढे नेऊ असा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

    स्वामी चिदानंद म्हणाले की, नदी आपल्याला जीवन शिकवते. पाणी जपून वापरले पाहिजे. नद्या वाचविण्यासाठी आता कृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांनी नृत्याविष्कारातून गंगेची विविध रूपे प्रेक्षकांसमोर सादर केली.

    कार्यक्रमानंतर यातील सर्व कलाकारांचे कौतुक मान्यवरांनी केले.या कार्यक्रमास कोकिलाबेन अंबानी, राजश्री बिर्ला, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि सुभाष घई आदींसह कला, संस्कृती, उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. आभार प्रधान सचिव श्री. खारगे यांनी मानले.