बंद

    08.01.2021 : आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरीकाचे योगदान महत्वाचे- राज्यपाल

    प्रकाशित तारीख: January 8, 2021

    आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरीकाचे योगदान महत्वाचे-
    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

    ठाणे,दि. ८ -सोने कि चिडीया म्हटला जाणारा भारत समृद्ध देश होता. परकीय आक्रमणानंतरही देशाची वाटचाल सुरुच राहिली. त्यानंतरही महापुरुषांच्या बलिदान आणि दूरदृष्टीने भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले. याच भारताने जगाला विश्वबंधुत्व आणि वसुधैवकुटुंबकमचा संदेश दिला, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी ठाण्यात केले.

    ठाण्यात आयोजित ३५ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे उद्धाटन राज्यपालांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष संजय केळकर, तसेच आमदार निरंजन डावखरे व्यासपीठावर उपस्थित होते. केळकर यांनी यावेळी राज्यपालांचे स्वागत केले.

    उद्घाटनाच्या सुरुवातीला कोश्यारी यांनी उपस्थितांशी मराठीत संवाद साधून ‘मला खोकला होतोय, इतकी मराठी मी शिकलोय’ असे सांगून आपल्या मिश्किल स्वभावाची चुणूक दाखवली.

    पुढे बोलताना त्यांनी आपल्या देशाला संत, थोेर महापुरुष व व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्याच विचारांवर देश चाललाय हे आपले वैशिष्ट्य आहे. आपला इतिहास हेच देशाचे प्रजातंत्र आहे. अनेक आक्रमणानंतरही आपला देश जिवंतच नाही तर समृद्ध आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, पण हे तेव्हाच होईल जेव्हा आपण आत्मनिर्भर बनू. चिनी वस्तू, उत्पादन विकणं बंद करु हे फक्त भारतच करू शकतो, इतकी हिंमत दुसर्या कोणत्या देशात नाही. पूर्वी धान्याची आयात व्हायची आता धान्य गोदामांमध्ये सडतयं, इतका देश सुजलाम सुफलाम आहे. देशाला समृद्ध बनवणे हे मुंगेरीलाल के हसीन सपने नही, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिलं पाहिजे असेही ते म्हणाले. तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जगभरातील १८० देश एकत्र येतात ही बाब अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काैतुकही केले.तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्य‍ंच्या द प्रेसिडेन्शियल इयर या पुस्तकात पंतप्रधानाच्या कार्याचा गौरव केला आहे.