बंद

    01.05.2022: सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: May 2, 2022

    शाश्वत शेती विकासासाठी इस्कॉनचे ‘हरी बोल’
    सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    सेंद्रिय शेती जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे तसेच सेंद्रिय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहेत. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांमुळे शेतकरी बांधव समृद्ध होतील त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम इस्कॉनच्या ‘हरी बोल’ उपक्रमाच्या माध्यमातून केले जावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    राज्यपाल कोश्यारी यांनी जुहू येथील इस्कॉन सभागृहात ‘सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना’ या उपक्रमाचा शुभारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.

    सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, जैव विविधता टिकेल तसेच मृदा आरोग्य चांगले राहील असे सांगून नागरिकांनी सेंद्रिय शेतीतील अन्नधान्य, दुग्ध उत्पादने, मध आदी जिन्नस खरेदी करून शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    यावेळी इस्कॉनचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, मायापुर येथील इस्कॉन मंदिराचे विश्वस्त ब्रज विलास दास प्रभू, गौरांग दास, याचनीत पुष्करणा, टी सी उपरेती, गोपाळ उपरेती आदी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी इस्कॉन मंदिराला भेट देऊन रासबिहारी भगवान यांची आरती केली.